जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण देशावर परिणाम करणाऱ्या १२ महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या ‘द मोदी इयर्स’ या पुस्तकाचे नुकतेच येथे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, या पुस्तकाचे संपादक भगवान दातार आदी मान्यवर उपस्थित होते.
नामवंतांचे लेख, दर्जेदार छपाई, मोदींची दुर्मिळ छायाचित्रे, अद्ययावत आकडेवारी आणि मोदींच्या व्यक्तीमत्वातली मानवी बाजू दाखवणारे असे हे पुस्तक आहे. दोनशे पानांच्या या पुस्तकात शंभर पाने रंगीत असून, पुस्तकात एकही जाहिरात नाही. पुस्तकाला २०१९ची डायरी जोडलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक वर्षभर वाचकांच्या, कार्यकर्त्यांच्या हातात राहील.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, मुख्तार अब्बास नकवी, खासदार मीनाक्षी लेखी, लेफ्ट. जन. निंभोरकर, शहजाद पुनावाला, उद्योगपती राम भोगले, डॉ. सुरेश हावरे, शैलेंद्र देवळाणकर, मेजर गौरव आर्य, सुनील साठे, माधव भांडारी, विजया रहाटकर, हनुमंत गायकवाड अशा १६ नामवंतांचे नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, उज्ज्वला गॅस योजना, तीन तलाक, जी. एस. टी., स्वच्छ भारत, जन धन योजना अशा महत्त्वाच्या विषयांवर लेख आहेत. या पुस्तकाची संकल्पना आणि संपादन भगवान दातार यांचे असून, इमेज मीडियाने ते प्रकाशित केले आहे.